श्री गुरुलीलामृत अर्थात श्रीदत्तात्रेयांचे पूर्णावतार अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ अवतार रहस्य
अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने विशेष चिंतनवर्ग - 13 ते 20 मार्च 2026
वक्ते - श्री. प्रणव गोखले
श्रीआनंदभारती महाराज प्रेरित आणि कै. गोपाळराव विद्वांस लिखित अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास आणि चिंतनवर्ग
अक्कलकोट - श्रीस्वामी समर्थांचे एक अंतरंग शिष्य आनंदभारती हे होते. त्यांच्यावर श्रीस्वामींची आत्यंतिक कृपादृष्टी होती. त्यांनी श्रीस्वामी समर्थांचे जीवन चरित्र लिहिण्याची प्रेरणा त्यांचे एक शिष्य गोपाळराव विद्वांस यांना दिली. आनंदभारती महाराजांनी निवेदन केल्याप्रमाणे गोपाळरावांनी श्रीगुरुलीलामृताची रचना केली आहे. श्रीदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती आणि श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारांच्या लीला या श्रीगुरुलीलामृत ग्रंथामध्ये वर्णिल्या आहेत.
श्रीगुरुचरित्र या दत्तसंप्रदायातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रासादिक ग्रंथाचा आधार घेऊन महाराजांनी श्रीगुरुलीलामृत या ग्रंथाची रचना केली आहे. मानव जातीमधील सत्य - अहिंसा - धर्म - नीती यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले, दैनंदिन जीवनास अन्याय व अधर्माचा संसर्ग ग्रासू लागला की, परमेश्वराला जगदुद्धाराकरिता सज्जनांचे संरक्षण करण्याच्या हेतूने दुर्जनांचे निर्दालन करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याने 'श्रीदत्तावतार' घेऊन दत्तसंप्रदाय निर्माण करण्याचे कार्य करतेवेळी श्रीदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व श्रीस्वामी समर्थ ह्या चार पूर्ण अवतारांत जी लोकोत्तर सत्कृत्ये केली, जगाला जो भक्तीचा मार्ग दाखविला, तो सर्वसामान्य जनांना समजावा आणि त्यांचे जीवन परमेश्वर उपासनेत सार्थकी लागावे, या उदात्त ध्येयाने 'श्रीगुरुलीलामृत' ग्रंथ लिहिण्यात आला आहे. दत्त अवताराचे सातत्य आणि आत्यंतिक कृपावर्षाव यांची अनुभूती यामधून आपल्याला येते. या २१ अध्यायी ग्रंथाचा अभ्यास आणि त्यातील रहस्य जाणून घेणे असा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे.